रविवार, १२ डिसेंबर, २०२१

सार्वजनिक मालमत्ता आणि आपली जबाबदारी

 


   

      सार्वजनिक मालमत्ता ही वैयक्तिक योगदानातूनच निर्माण झालेली असते. विशेषत: आपण जेव्हा सरकारी मालमत्ता असे म्हणतो तेव्हा आपण त्या मालमत्तेचे मालक असतो, कारण आपल्याच पैशातून ती निर्माण झालेली असते. सार्वजनिक मालमत्ता ही सुयोग्य राखणे, त्याचा सुयोग्य वापर करणे ही नागरिक म्हणून आपली एक फार मोठी जबाबदारी असते; परंतु बरेचदा नागरिकांकडून हे घडताना दिसत नाही, कारण सार्वजनिक मालमत्ते बाबत आपले विचार सुस्पष्ट नसतात.  एखादा संप, मोर्चा यामधून मोठ्या संख्येने लोकसमुदाय गोळा होतो तेव्हा तेथे सामूहिक मानसिकतेतून सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड किंवा नुकसान होताना दिसते. अशावेळी ती सार्वजनिक मालमत्ता आपलीच आहे याचे भान अशा लोकांना राहत नाही. हे सर्वथा चूक आहे.

      अनेकदा सार्वजनिक ठिकाणी आपल्याकडून सहजपणे अस्वच्छता होते. थुंकणे, लघवी करणे यासारख्या गोष्टी सर्रासपणे सार्वजनिक ठिकाणी होताना दिसतात. आपण आपल्या घरातील स्वच्छतेबाबत जितके जागरूक असतो तितके सार्वजनिक स्वच्छतेबाबत असत नाही. याचे धडे बालपणापासून मिळाले पाहिजेत. आई-वडिलांकडूनच अशा प्रकारच्या चुका होत असतील तर निश्चितपणे त्यांच्या पाल्यांकडून अशा प्रकारच्या चुका सहजपणे होतात.  

      एस.टी. बस मधे बसल्यावर उगीचच एखाद्याकडून सीटचा कॅनवास फाडला जातो, त्यावेळी ती कृती बघणारा दुसरा माणूस, आपण या मालमत्तेचे मालक आहोत हे लक्षात घेऊन त्याला रोखत नाही.  माझे काय जाते आहे?  ही तर सार्वजनिक मालमत्ता आहे’, हीच त्याची त्यावेळची भूमिका असते आणि त्यामुळे असे प्रकार वाढत जाताना दिसतात.  मी अशा चुकीच्या गोष्टी करणार नाही आणि कोणी चुकीच्या गोष्टी करणारा असेल तर माझ्या परीने मी त्याला परावृत्त करेन अशी भूमिका प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे. भारताचा नागरिक म्हणून आपणास एक स्वयंशिस्त असलीच पाहिजे.  आपल्या भारतीय संस्कृतीत सांगितलेल्या काही महत्त्वाच्या मूल्यांचे पालन करताना या गोष्टी जबाबदारीने केल्या पाहिजेत हे लक्षात घेतले पाहिजे.

      सरकार विरोधातील आंदोलने करताना विशेषतः एस.टी. बसेस, रेल्वे यांच्यावर दगडफेक करून आंदोलक आपला राग व्यक्त करतात: परंतु बसेसची, रेल्वेची तोडफोड होऊन त्या मालमत्तेचे नुकसान हे आपलेच होते आहे, ती मालमत्ता पुन्हा उभी करण्यासाठी आपल्याच खिशातील पैशांमधून ती उभी राहणार आहे याची जाणीव त्या आंदोलकांना करून देणे आवश्यक आहे. तसेच काही मूठभर लोकांच्या अशा दुष्कृत्यांमुळे त्याची भरपाई सामान्य माणसाला करून द्यावी लागत आहे. अशावेळी सरकारी मालमत्तेची नासधूस करणाऱ्यावर योग्य कारवाई करून त्या मालमत्तेच्या नुकसानीस पूर्णपणे त्या संबंधितास जबाबदार धरले व दंड वसूल करण्यात आला तर काही प्रमाणामध्ये अशा कृत्यांना आळा बसू शकेल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सी.टी.व्ही. सारख्या उपकरणांनी अशाप्रकारे आंदोलकांवर किंवा नासधूस करणाऱ्या व्यक्तींवर नजर ठेवणे फारसे अशक्य नाही.



      लोकशाहीमध्ये आंदोलन करणे, मोर्चा काढणे हे चुकीचे नसले तरीदेखील सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून असे मोर्चे काढणे किंवा आंदोलने करणे हे मात्र फारसे मनाला पटणारे नाही.  आपल्याकडे सार्वजनिक मुताऱ्या, संडास बांधले जातात परंतु त्याची देखभाल, दुरुस्ती, स्वच्छता याची तजवीज केली जात नाही. त्यातच नागरिकांच्या चुकीच्या सवयींमुळे ही अस्वच्छता वाढतच जाते. आपल्याकडील सार्वजनिक शौचालये बघितल्यावर आपल्याला त्याचे प्रत्यंतर येते. सार्वजनिक वस्तू जेव्हा चोरी होऊ नये म्हणून साखळीने बांधल्या जातात तेव्हा खर तर आपल्या स्वतःलाच आपली लाज वाटली पाहिजे.

      आपल्या कुटुंबात आपणास आपल्या कुटुंब प्रमुखांचा किंवा कुटुंबीयांचा राग आल्यास तो व्यक्त करताना आपल्याच घरातील टी.व्ही. आपण फोडतो का? फ्रिज, वॉशिंग मशीनची तोडफोड करतो का? मग सरकारच्या विरोधात राग व्यक्त करताना सरकारी मालमत्तेची( म्हणजे आपल्याच मालमत्तेची) तोडफोड करून तो का व्यक्त करावा?  हा प्रश्न आहे.  भारतीय संस्कृतीत हिंसात्मक आंदोलन हे निषिद्ध आहे.  महात्मा गांधींनी केवळ उपोषणाच्या मार्गाने ब्रिटिश सरकारकडून कितीतरी गोष्टी मिळवल्या होत्या.  बऱ्याचदा सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी अशी आंदोलने होतात: पण सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी हिंसे पेक्षा इतर अनेक चांगले मार्ग आहेत त्याचा अवलंब करायला हरकत नाही.  सरकारी यंत्रणांनीही अशी आंदोलने करण्याची वेळच येऊ देऊ नये किंवा अशा आंदोलनांकडे दुर्लक्ष करून आंदोलनाला खतपाणी घालू नये,

      थोडक्यात लोकशाही असलेल्या देशांमध्ये आंदोलने होणार: परंतु ती आंदोलने अहिंसात्मक असावी.  त्यासाठी एक संहिता तयार करावी.  त्या विशिष्ट चौकटीत ही आंदोलने व्हावीत.  त्या संहितेत आंदोलकांवरील निर्बंधांबरोबरच सरकारी जबाबदारी ही स्पष्ट असावी.  असे झाल्यास सनदशीर मार्गाने आंदोलने होतील आणि सरकारी मालमत्तेचे होणारे नुकसानही टाळता येईल. सार्वजनिक स्वच्छता, देशप्रेम, आदर्श नागरिक म्हणून आपली जबाबदारी या गोष्टी प्रत्येक व्यक्तीच्या मनावर बालवयापासून बिंबवल्या गेल्या पाहिजेत तरच आपण अशा चुकीच्या प्रवृत्तींना आळा घालू शकू.


१२ टिप्पण्या:

  1. There is no aware everyone therwhy every one try to understand how save our property. You written very well. Well done friends with best wishes.

    उत्तर द्याहटवा
  2. खूप छान..प्रत्येक माणसाने आत्मचिंतन करावे असे मौलिक विचार ..आपल्या देशातील नागरिकांनी आणि त्यांच्या पुढाऱ्यांनी हे विचार रुजविल्यास आपला देश आर्थिक दृष्टीने खूप संपन्न होईल ...

    उत्तर द्याहटवा