रविवार, २२ मार्च, २०२६

भोंदू बाबांचे जाळे: गंभीर प्रश्न

 


आजच्या काळात समाजासमोर उभ्या राहिलेल्या अनेक समस्यांपैकी एक गंभीर समस्या म्हणजे भोंदू बाबांचे वाढते जाळे. श्रद्धा ही भारतीय संस्कृतीचा कणा आहे; पण जेव्हा हीच श्रद्धा विवेकशून्य बनते, तेव्हा ती शोषणाचे साधन बनते. काही तथाकथित ‘गुरु’ लोकांच्या अडचणी, भीती आणि भावनिक कमकुवतपणाचा फायदा घेतात, चमत्कारांचे आमिष दाखवतात आणि लोकांच्या आयुष्यावरच ताबा मिळवतात. कोट्यवधींची संपत्ती, आलिशान आश्रम, आणि त्यामागे असणारे राजकीय पाठबळ—हे चित्र केवळ वेदनादायक नाही, तर धोकादायक आहे.

अलीकडच्या काळात आपण वारंवार पाहतो की, काही तथाकथित ‘बाबा’ लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतात, कोट्यवधींची संपत्ती जमवतात आणि काही वेळा त्यांना राजकीय वरदहस्तही लाभतो. या सगळ्या घटना केवळ धक्कादायक नाहीत, तर समाजाच्या नैतिक अध:पतनाचे लक्षणही आहेत. अशा वेळी एक मूलभूत प्रश्न आपल्या समोर उभा राहतो—आपल्या समाजात नेमके काय कमी पडते आहे?

याचे उत्तर शोधताना आपल्याला ‘संस्कार’ या संकल्पनेपर्यंत यावे लागते. कारण कायदे, नियम, शिक्षा या गोष्टी आवश्यक असल्या तरी त्या फक्त बाह्य नियंत्रण ठेवतात; मनावर नियंत्रण ठेवत नाहीत. एखादा कठोर कायदा अस्तित्वात असला, तरी तो गुन्हेगाराला थोडा वेळ थांबवू शकतो, पण त्याच्या मनातील वाईट प्रवृत्ती पूर्णपणे नष्ट करू शकत नाही. उलट, जर एखाद्या व्यक्तीवर लहानपणापासून चांगले संस्कार झाले असतील, तर त्याच्या मनात चुकीचा विचारही उभा राहत नाही.

याच संदर्भात एक साधे उदाहरण द्यायचे झाले तर, रस्त्यावर सिग्नल लाल असताना गाडी थांबवणारा माणूस दोन प्रकारचा दिसतो. एक तो, जो पोलिसांच्या भीतीने थांबतो; आणि दुसरा तो, जो ‘नियम पाळणे ही आपली जबाबदारी आहे’ या संस्कारामुळे थांबतो. पहिला माणूस पोलिस नसतील तर नियम तोडण्याची शक्यता असते; पण दुसरा माणूस कुठेही असला तरी नियम पाळतो. हाच फरक कायद्याने नियंत्रित समाज आणि संस्कारांनी घडवलेल्या समाजात आहे.

आणखी एक उदाहरण द्यायचे झाले तर, एखाद्या दुकानात चुकून जास्त पैसे परत मिळाले, तर काहीजण ते परत करतात, तर काहीजण गप्प बसतात. कायद्याने त्यांना पकडणे कठीण असते; पण त्यांच्या अंतःकरणातील संस्कार त्यांना योग्य निर्णय घ्यायला भाग पाडतात. म्हणजेच, या उदाहरणांतून बाह्य नियंत्रण’ आणि ‘आंतरिक नियंत्रण’ यातील फरक स्पष्ट होतो.

इतिहासात आपण पाहिले आहे की, अंधश्रद्धेचा अतिरेक समाजाला किती मोठ्या संकटात ढकलू शकतो. ‘चमत्कार’ या नावाखाली अनेकांनी आपले आयुष्य, संपत्ती आणि कधी कधी कुटुंबही गमावले आहे. काही प्रकरणांमध्ये तर महिलांवर अत्याचार, आर्थिक फसवणूक आणि मानसिक गुलामी यासारख्या घटना समोर आल्या आहेत. प्रश्न असा आहे की, एवढ्या शिक्षणानंतरही लोक अशा जाळ्यात का अडकतात? याचे मूळ कारण म्हणजे ‘संस्कारांचा अभाव’ आणि ‘विवेकशक्तीची कमतरता’. शिक्षण म्हणजे फक्त पदवी किंवा नोकरी नव्हे; तर योग्य-अयोग्य यातील फरक समजण्याची क्षमता. जर ही क्षमता विकसित झाली नाही, तर उच्चशिक्षित व्यक्तीदेखील अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकू शकते. अलीकडच्या काळात ही वारंवार दिसू लागले आहे.

पूर्वीची एकत्र कुटुंब पद्धती ही केवळ आर्थिक किंवा सामाजिक रचना नव्हती, तर ती संस्कारांची शाळा होती. आजोबा-आजींच्या गोष्टी, आई-वडिलांचे मार्गदर्शन, मोठ्या भावंडांचे अनुकरण, या सर्व माध्यमांतून मूल्यांची जपणूक होत असे. ‘सत्य’, ‘प्रामाणिकपणा’, ‘परस्पर आदर’, ‘श्रद्धा ही मूल्ये विवेकासह’ नकळत मनात रुजत असत. त्यामुळे व्यक्ती फक्त शिक्षित होत नव्हती, तर ती सुशिक्षित आणि सुसंस्कृतही होत होती. ही कुटुंब पद्धती या आंतरिक नियंत्रणाची मजबूत पायाभरणी करत होती. घरातील वडीलधाऱ्यांचा अनुभव, नैतिक मूल्यांवर आधारित संवाद, आणि दैनंदिन जीवनातील छोट्या-छोट्या कृतींमधून मुलांमध्ये प्रामाणिकपणा, संयम आणि विवेक या गुणांची जोपासना होत होती. ‘काय बरोबर आहे?’ हा प्रश्न विचारण्याची सवय तिथेच लागायची.

आज मात्र परिस्थिती बदलली आहे. विभक्त कुटुंब पद्धती, तंत्रज्ञानाचा अतिरेक, स्पर्धेचा ताण आणि वेगवान जीवनशैली यामुळे मूल्यशिक्षण मागे पडताना दिसते. माहिती प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे, पण विवेकाने विचार करण्याची सवय नसल्यामुळे लोक सहजपणे कोणत्याही ‘चमत्कारां’च्या किंवा ‘अवडंबरां’च्या जाळ्यात अडकतात. सोशल मीडियावर पसरवले जाणारे खोटे दावे, चमत्कारांचे व्हिडिओ, आणि भावनिक भाषणे लोकांना पटकन प्रभावित करतात. लोक सहजपणे अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात. आणि याच ठिकाणी भोंदू लोक आपला डाव साधतात.

यावर उपाय म्हणून केवळ नवीन कठोर कायदे बनवणे पुरेसे नाही. प्रशासन सुरळीत चालण्यासाठी कायदे आवश्यक आहेत, ते शेवटचा उपाय आहेत, पण समाज सुदृढ राहण्यासाठी संस्कार आवश्यक आहेत. शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये आणि घराघरांत मूल्यशिक्षणाला पुन्हा प्राधान्य देणे गरजेचे आहे. खरा उपाय म्हणजे ‘संस्कारक्षम समाज’ घडवणे. मुलांना प्रश्न विचारायला शिकवणे, विवेकाने विचार करायला प्रवृत्त करणे आणि अंधश्रद्धा व श्रद्धा यामधील फरक समजावून सांगणे, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन विकसित करणे, आणि ‘श्रद्धा + विवेक’ यांचा समतोल साधायला शिकवणे ही काळाची गरज आहे.

तसेच, समाजातील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. पालकांनी मुलांसोबत वेळ घालवणे, शिक्षकांनी केवळ पुस्तकापुरते शिक्षण न देता जीवनमूल्ये रुजवणे, आणि माध्यमांनी जबाबदारीने बातम्या सादर करणे आवश्यक आहे. समाजातील आदर्श व्यक्तींनी आपल्या वर्तनातून संदेश दिला पाहिजे की, यश हे प्रामाणिकपणा आणि कष्टातूनच मिळते, चमत्कारातून नाही. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम होऊ शकतो.

शेवटी, समाज बदलण्याची सुरुवात ही व्यक्तीपासूनच होते. कायद्याची भीती माणसाला थांबवू शकते, पण संस्कार त्याला योग्य मार्गावर चालायला प्रेरणा देतात. म्हणूनच, आजच्या काळात सर्वात मोठी गरज आहे ती ‘संस्कारक्षम पिढी’ घडवण्याची. कारण जेव्हा मन शुद्ध असेल, तेव्हा समाजही नक्कीच सुदृढ आणि सशक्त बनेल. जेव्हा माणसाच्या मनात विवेक आणि मूल्यांची ज्योत प्रज्वलित होते, तेव्हा कोणतीही अंधश्रद्धा, कोणताही भ्रम त्याला विचलित करू शकत नाही. आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने एक सशक्त, जागरूक आणि नैतिकदृष्ट्या समृद्ध समाज निर्माण होऊ शकतो.

 

रविवार, १ मार्च, २०२६

उच्चशिक्षितांची गुन्हेगारी....

 


आजच्या काळात उच्चशिक्षित व्यक्ती दहशतवादाकडे, संघटित गुन्हेगारीकडे किंवा इतर वाईट प्रवृत्तीकडे वळत असल्याचे जे चित्र दिसते, ते समाजासाठी अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे. आजच्या सामाजिक वास्तवाकडे पाहिले असता उच्चशिक्षित लोकांचा दहशतवादाकडे किंवा वाईट प्रवृत्तींकडे होणारा कल ही केवळ वैयक्तिक अपयशाची बाब नसून, ती संपूर्ण व्यवस्थेच्या अपुऱ्या नियोजनाची आणि संवेदनशीलतेच्या अभावाची परिणती आहे, हे अधिक ठळकपणे जाणवते. शिक्षण म्हणजे विवेक, संवेदनशीलता आणि जबाबदारी वाढवणारे साधन मानले जाते, शिक्षणाने व्यक्तीला विचार करण्याची ताकद दिली जाते; मात्र जेव्हा हीच शिक्षणातून आलेली बौद्धिक क्षमता विध्वंसक मार्गाने वापरली जाते, तेव्हा त्याचे परिणाम अधिक भयावह ठरतात.

आज अनेक उच्चशिक्षित तरुण वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षा देत राहतात, कंत्राटी नोकऱ्यांवर अस्थिर जीवन जगतात किंवा त्यांना आपल्या क्षमतेपेक्षा खूपच कमी दर्जाचे काम स्वीकारण्यास भाग पाडले जाते . या प्रक्रियेत आत्मसन्मानाला तडे जातात आणि “आपण इतके शिकूनही उपेक्षित आहोत” ही भावना त्यांच्या मनात खोलवर रुजते. योग्य शिक्षण घेतलेला, कौशल्यसंपन्न तरुण जेव्हा रोजगाराच्या संधींच्या अभावामुळे निराश होतो, तेव्हा त्याच्या मनात असंतोष, अन्यायाची भावना आणि व्यवस्थेविषयी तिरस्कार निर्माण होतो. हीच पोकळी काही वेळा दहशतवादी संघटना, कट्टर विचारसरणी किंवा गुन्हेगारी टोळ्या अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने भरून काढतात.

केवळ बेरोजगारीच नव्हे तर मूल्यशिक्षणाचा अभाव हाही एक महत्त्वाचा घटक ठरत आहे. शिक्षण व्यवस्था मोठ्या प्रमाणावर गुण, पदव्या आणि स्पर्धेवर केंद्रित झाली असली तरी मानवी मूल्ये, सामाजिक बांधिलकी, सहअस्तित्व आणि संवेदनशीलता यांचे संस्कार मागे पडताना दिसतात. परिणामी काही उच्चशिक्षित लोक कायदा, नैतिकता आणि सामाजिक जबाबदारी यांना अडथळे समजून, आपल्या बुद्धिमत्तेचा वापर जलद पैसा, सत्ता किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी करतात. आर्थिक गुन्हे, सायबर हल्ले, बनावट बातम्यांचा प्रसार किंवा समाजात तेढ निर्माण करणारे बौद्धिक कट यामध्ये अशा लोकांची भूमिका वाढताना दिसते. विशेष म्हणजे, हे गुन्हे दिसायला रक्तरंजित नसले तरी दीर्घकालीन नुकसान करणारे असतात आणि संपूर्ण समाजाच्या विश्वासव्यवस्थेलाच सुरुंग लावतात.

इतिहासात आणि वर्तमानातही अनेक उदाहरणे आढळतात की इंजिनिअर, डॉक्टर, आयटी व्यावसायिक किंवा संशोधक स्तरावरील व्यक्ती चुकीच्या विचारसरणीच्या प्रभावाखाली जाऊन समाजविरोधी कृत्यांमध्ये सहभागी झाल्या. अशा लोकांकडे केवळ हिंसेची क्षमता नसते, तर तंत्रज्ञानाचा वापर, आर्थिक नियोजन, गुप्त संवाद व्यवस्था आणि मनोवैज्ञानिक प्रभाव टाकण्याची कौशल्येही असतात, त्यामुळे त्यांचा धोका सर्वसामान्य गुन्हेगारांपेक्षा कितीतरी पटीने वाढतो. उदाहरणार्थ, सायबर गुन्हेगारीत किंवा आर्थिक फसवणुकीत सहभागी असलेले अनेक उच्चशिक्षित लोक अत्यंत सफाईदार पद्धतीने कायद्याच्या चौकटीला चुकवतात आणि सामान्य माणसाला लुटतात. तसेच काही दहशतवादी हल्ल्यांमागे असलेले मास्टरमाइंड हे थेट रणांगणात न उतरता, शिक्षणातून मिळालेल्या बौद्धिक सामर्थ्याचा वापर करून संपूर्ण यंत्रणा नियंत्रित करतात.

त्यामुळे समस्या केवळ बेरोजगारीपुरती मर्यादित राहत नाही, तर शिक्षण, मूल्यसंस्कार, रोजगार धोरणे आणि सामाजिक न्याय या सर्वांचा परस्पर संबंध स्पष्टपणे समोर येतो. उच्चशिक्षित तरुणांना केवळ पदवी देणे पुरेसे नसून, त्यांच्या कौशल्यांना योग्य दिशा, सन्मानजनक रोजगाराच्या संधी आणि समाजाशी सकारात्मक नाते जोडणारी व्यवस्था निर्माण करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा बुद्धीचा उपयोग सृजनासाठी न होता विध्वंसासाठी होण्याचा धोका वाढतच राहील, आणि हीच खरी धोक्याची घंटा समाजाने वेळेत ओळखण्याची गरज आहे.

या समस्येवर उपाय शोधताना केवळ सुरक्षा यंत्रणा बळकट करणे पुरेसे ठरत नाही, तर शिक्षण आणि रोजगार यांच्यामधील दरी भरून काढणे, तरुणांच्या मानसिक आरोग्याकडे गांभीर्याने पाहणे आणि त्यांना समाजनिर्मितीच्या प्रक्रियेत सहभागी करून घेणे तितकेच आवश्यक आहे. उच्चशिक्षित बुद्धिमत्ता ही समाजाची सर्वात मोठी संपत्ती आहे; तीच संपत्ती जर दुर्लक्षित राहिली, तर ती धोकादायक शस्त्रात रूपांतरित होऊ शकते. म्हणूनच योग्य संधी, योग्य मार्गदर्शन आणि योग्य मूल्यांची सांगड घालूनच या धोक्याच्या घंटेला वेळेत उत्तर देता येईल, अन्यथा बुद्धी आणि बेरोजगारी यांचा स्फोट समाजासाठी विनाशकारी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बुधवार, १४ जानेवारी, २०२६

तिळगुळ घ्या… आणि शब्दांना गोडवा द्या

 


भारतीय सण-उत्सव हे केवळ परंपरा जपण्यासाठी नसून ते आपल्याला आयुष्य जगण्याची दिशा देतात. मकर संक्रांत हा त्यापैकीच एक अत्यंत अर्थपूर्ण सण आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, उत्तरायण सुरू होते आणि निसर्ग नव्या ऊर्जेने भरून येतो. या बदलत्या ऋतूंसोबतच माणसानेही आपली दृष्टी, विचार आणि वाणी सकारात्मक करावी, असा संदेश हा सण देतो. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला” ही म्हण त्याचाच सार आहे. मकर संक्रांत येते तेव्हा नुसता सूर्यच उत्तरायणाला वळत नाही; माणसाच्या अंतर्मनालाही एक नवी दिशा मिळते. आकाशात पतंग उडत असतात, जमिनीवर तिळगुळाचा सुगंध दरवळत असतो आणि वाऱ्यात एक अदृश्य पण हळवा प्रश्न घोंगावत असतो — आपण खरंच गोड बोलतो का?

मकर संक्रांत हा केवळ एक सण नाही, तर तो जीवनाकडे पाहण्याची एक सकारात्मक दृष्टी देणारा दिवस आहे. सूर्य उत्तरायणाला लागतो, दिवस मोठे होऊ लागतात आणि अंधारावर प्रकाशाचा विजय होतो. पण या सणाचा सर्वात गोड संदेश आहे — तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.” ही म्हण फक्त औपचारिक शुभेच्छा नसून आयुष्य जगण्याचं एक तत्वज्ञान आहे. आयुष्यात माणूस अनेक अनुभवांतून जातो. सुख-दुःख, यश-अपयश, नाती-तणाव हे सगळं प्रत्येकाच्या वाट्याला येतंच. अशा वेळी माणसाचं मन आधीच थकलेलं असतं. त्या थकलेल्या मनावर एक गोड शब्द जादूसारखा काम करू शकतो. आपल्या शब्दांत अपार ताकद असते. एखादा कठोर शब्द आयुष्यभराची जखम देऊ शकतो, तर प्रेमाने बोललेला एक शब्द संकटातही आधार बनतो. रागात बोललेला शब्द आयुष्यभर बोचत राहतो, तर प्रेमाने उच्चारलेला शब्द मनात घर करून राहतो. माणसं कधीकधी दूर जातात, प्रसंग बदलतात, पण शब्दांची आठवण कायम राहते.

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला” ही म्हण ऐकायला साधी वाटते, पण तिचा अर्थ अतिशय खोल आहे. तिळगुळ हे केवळ खाद्यपदार्थ नाहीत; ते जीवनाचे प्रतीक आहेत. तिळ कडू असतो, जसा आयुष्यातील संघर्ष, अपयश, दुःख आणि वेदना. गुळ गोड असतो, जसा प्रेम, आपुलकी, समजूतदारपणा आणि माणुसकी. आयुष्य कडूपणाविना नसते, पण त्या कडूपणाला गोडव्यात गुंफण्याचं सामर्थ्य आपल्या वाणीत असतं. ही केवळ सणाची औपचारिकता नाही; हा जीवनाचा मौन उपदेश आहे. कारण शब्द हे नुसते उच्चार नसतात; ते अनुभूती असतात, स्मृती असतात, कधी कधी तर आयुष्यभर सोबत राहणाऱ्या सावल्याही असतात. तिळ कडू असतो. तो दाताखाली आला की चेहरा आपोआप वाकडा होतो. आयुष्यही तसंच असतं. कडवट अनुभव, अपमान, अपयश, अपेक्षाभंग—हे सगळं माणसाला नकोसं असतं, पण टाळता येत नाही. गुळ मात्र गोड असतो. तो कडूपणावर एक हळवी चादर पसरतो. शब्दांतील गोडवा हाच तो गुळ आहे, जो आयुष्याच्या कडवट क्षणांना सहनशील बनवतो.

माणूस जखमी होतो तो बहुतेक वेळा परिस्थितीमुळे नाही, तर शब्दांमुळे. रागाच्या भरात बोललेला एक वाक्यांश, उपेक्षेने फेकलेला एक शब्द, किंवा मौनातून उमटलेली थंड प्रतिक्रिया — हे सगळं खोलवर जखम करते. जखमा भरतात, पण शब्दांचे ओरखडे मनावर राहतात. काही शब्द तर असे असतात की ते माणसाच्या आत कुठेतरी कायमचं घर करून बसतात. आज संवादाचे मार्ग वाढले आहेत, पण संवादातली संवेदना हरवत चालली आहे. आपण पटकन बोलतो, पटकन प्रतिक्रिया देतो, पण समोरच्या मनाचा ठाव घेण्याइतके थांबत नाही. प्रत्येक माणूस आतून काहीतरी लपवत जगत असतो — एखादी भीती, एखादा अपमान, एखादी न सांगता आलेली वेदना. अशा वेळी आपला एक साधा, प्रेमळ शब्द कोणाच्या तरी मनात उजेडाचा दिवा लावू शकतो.

गोड बोलणं म्हणजे नेहमीच हसतमुख राहणं नव्हे. ते खोटं सौजन्यही नाही. गोड बोलणं म्हणजे शब्दांमागे माणुसकी ठेवणं. कठोर सत्यही सांगताना आवाजात कणव असणं. मतभेद व्यक्त करतानाही नात्याची वीण न तुटू देणं. ही कला सहज जमत नाही; ती संयमातून, आत्मभानातून आणि दुसऱ्याच्या वेदनेला समजून घेण्याच्या प्रयत्नातून जन्माला येते. मकर संक्रांत आपल्याला सांगते—सूर्य जसा उत्तरायणाला वळतो, तशीच आपली वाणीही सकारात्मक दिशेला वळू दे. कारण जग बदलायला वेळ लागतो, पण शब्द बदलायला क्षण पुरतो. आणि तो क्षण अनेक आयुष्यांच्या वळणावर निर्णायक ठरू शकतो.

तिळगुळ सणापुरता असतो, पतंग संध्याकाळपर्यंतच आकाशात असतात; पण त्या दिवशी दिलेला गोड शब्द, त्या क्षणी दाखवलेली समज, कुणाच्या तरी आयुष्याला दिशा देऊन जाते. म्हणूनच गोड बोलणं ही केवळ सामाजिक गरज नाही, तर एक मानवी जबाबदारी आहे. या मकर संक्रांतीला आपण तिळगुळ हातात देताना मनातही गोडवा भरूया. शब्दांना धार देण्याऐवजी त्यांना गोडवा देऊया. कारण कधी कधी एका गोड शब्दाने जे साध्य होतं, ते हजार स्पष्टीकरणांनीही होत नाही.

🌞 मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!