शुक्रवार, ३० जुलै, २०२१

गरज आपत्ती पूर्व नियोजनाची…..

 

अलीकडच्या काळात निसर्गाने अनेकदा आपले रौद्ररूप दाखवले आहे.  कितीतरी नैसर्गिक आपत्तींना आपल्याला तोंड द्यावे लागत आहे.  अगदी अलीकडच्या काळातील निसर्ग वादळ तौक्ते वादळ, खेड, चिपळूण, महाड, सांगली, कोल्हापूर परिसरात झालेला महापूर, भूस्खलन यासारख्या संकटांचा विचार करता आपत्ती व्यवस्थापन आणि त्याची गरज सहजपणे लक्षात येते; परंतु आपत्ती व्यवस्थापनात आपत्ती येऊच नये यासाठी उपाययोजना आणि आपत्ती आलीच तर आम्ही त्याला कसे तोंड देऊ याचा प्रामुख्याने विचार असतो. एकंदरीत आपत्तीपूर्व नियोजनात आपण कमी पडतो आहोत असे लक्षात येते.

      आपत्ती आल्यावर काय करणार? याचे नियोजन जितके महत्त्वाचे आहे, त्याहीपेक्षा आपत्ती येण्याअगोदरचे नियोजन जास्त महत्त्वाचे आहे. आपत्ती ही बऱ्याचदा अचानक येते, काही कळायच्या आत होत्याचं नव्हतं होतं; पण काही आपत्ती अशा आहेत की ज्या येऊ शकतात याचा आपण अगोदरच अंदाज बांधू शकतो. ज्या आपत्तींचा आपण अंदाज बांधू शकतो अशा आपत्तींना तोंड देणं तुलनेनं सोपं असतं. आपत्तीपूर्व नियोजनातून अशा संकटांना आपण निश्चितपणे तोंड देऊ शकतो.  आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आपण आज आपल्या विकासासाठी अनेक क्षेत्रात करत आहोत. आपत्ती व्यवस्थापनासाठी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण संकटाची तीव्रता खूपच कमी करू शकतो. हवामान विभागाकडून अलीकडच्या काळात बऱ्याचदा पूर्व अंदाज उत्तम प्रकारे सांगितले जात आहेत. बर्‍याचदा ते अंदाज खरे ठरत आहेत, पण असे असले तरी संकटांची संख्या मात्र कमी झाली नाही किंवा नुकसानही कमी होताना दिसत नाही. अर्थात जागतिक तापमान वाढ आणि निसर्गामध्ये मानवाचा अवाजवी हस्तक्षेप यामुळेही हे घडताना दिसत आहे.

      एखादे वादळ, महापूर, अतिवृष्टी आपण थांबवू शकत नाही; पण त्यापासून होणारी जीवीतहानी, वित्तहानी मात्र आपण निश्चितपणे कमी करू शकतो; परंतु त्यासाठी गरज आहे ती आपत्तीपूर्व नियोजनाची.  जपानमध्ये वारंवार भूकंप होतात, म्हणून तिथल्या लोकांची घरे की पुठ्ठ्याची बनवलेली असतात आणि भूकंप होऊन गेल्यावर काही वेळातच त्यांचं पडलेलं घर परत उभं राहतं, हे असं का घडतं; कारण तिथला प्रत्येक नागरिक आपत्तीस सरावलेला आहे, त्यांने आपत्ती गृहीत धरली आहे, त्याचा बाऊ न करता ती आपत्ती तो स्वीकारतो आहे.  अशा प्रकारे आपल्या देशातील नागरिकांना घडवले गेले पाहिजे, हा सुद्धा एक आपत्तीपूर्व नियोजनाचा भाग आहे.

      आपल्याकडे अशा मोठ्या आपत्ती आल्यावर अनेक सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती खूप मोठ्या प्रमाणावर मदत करतात; परंतु ती मदत सर्व माणसापर्यंत बर्‍याचदा पोहोचत नाही.  एखादी वस्तूरुपी मदत घेऊन येणारी गाडी रस्त्यावरच थांबवून त्या वस्तू आपल्याला जास्तीत जास्त कशा मिळतील यासाठी लोकांची झुंबड उडते; परंतु माझ्यासारखीच इतरांनाही या मदतीची गरज आहे हाँ विचार बर्‍याचदा केला जात नाही. सक्षम व्यक्तीने मदत नाकारणे व अक्षम व्यक्तींपर्यंत पोहोचण्यास मदत करणे, हे जेव्हा घडेल तेव्हा आम्ही अशा कितीही मोठ्या संकटांना समर्थपणे तोंड देऊ शकतो.  त्यासाठी गरज आहे ती लोकांच्या प्रमाणिकपणाची, चांगल्या मानसिकतेची.

      सरकारी पातळीवर आपत्ती घडल्यावर मोठमोठी पॅकेजिस जाहीर होतात.  मृतांच्या नातेवाईकांनी एवढे लाख, जखमींना एवढे, नुकसान झालेल्यांना एवढे, असे पैसे जाहीर होतात.  याची तर गरज आहेच; पण अगोदरच काही पैसा आपत्ती येऊच नये म्हणून उपाययोजना करण्यावर खर्च केला तर कदाचित अशा प्रकारच्या पॅकेजिसची गरजच पडणार नाही.  सरकारी पातळीवर सक्षम अशा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची आज गरज निर्माण झाली आहे आणि त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा लागेल. हे तंत्रज्ञान येथील स्थानिक भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्माण केले जावे.  त्यासाठी परदेशी तंत्रज्ञानाचा अभ्यास करणेही आवश्यक आहे.

      नद्यांमधील गाळ काढणे, गटारे साफ करणे, अनधिकृत बांधकामे रोखणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, भूस्खलन रोखण्यासाठी यंत्रणा राबवणे याबरोबरच आपत्तीच्या वेळी मोठ्या आवाजाचे स्वयंचलित आलार्म वाजले पाहिजेत, अलार्म वाजल्यावर नागरिकांनी काय करावे? त्याचे प्रशिक्षण प्रत्येक नागरिकाला दिले पाहिजे.  संकटकाळात लोकांचे स्थलांतर करायची वेळ आली तर लोकांनी काय करावे? त्यासाठी शिस्तबद्ध यंत्रणा उभी करावी लागेल.  एन.डी.आर.एफ. चे जवान येण्याची वाट बघावी लागू नये.  त्यासाठी स्थानिक पातळीवर युवकांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे.  अशा संकटकालीन मदतीच्या वेळी केवळ सरकारी पातळीवरून संकटाला तोंड देणं शक्य नाही, यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे.  त्यासाठी स्वयंसेवी संस्था व सरकार यांच्यात समन्वय असलाच पाहिजे.  आजवरच्या निसर्गातील मानवी हस्तक्षेपाचा विचार करता अशा आपत्ती या येतच राहणार आहेत; परंतु या आपत्ती मधून होणारे नुकसान टाळण्यासाठी आपत्तीपूर्व नियोजनावर सर्वाधिक भर द्यावा लागेल, तरच अशा प्रकारच्या आपत्ती रोखणे व त्याची तीव्रता कमी करणे  शक्य आहे.


शुक्रवार, १६ जुलै, २०२१

‘स्वयं’ मंत्राचे अस्त्र

 

       कोरोना संकटामुळे सध्याचा काळ हा खूपच कठीण जातो आहे.  जवळपास सर्वच क्षेत्रांवर कोरोनाचा प्रभाव पडलेला दिसतो.  संपूर्ण जगाची आर्थिक घडी विस्कटल्याचे चित्र आपणास दिसत आहे.  रोजगार, शिक्षण यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांचे झालेले नुकसान हे न भरून निघणारे नुकसान आहे.  या काळात अनेकांचे रोजगार गेले, नोकऱ्या गेल्या, त्यातून आलेला मानसिक ताण, शिक्षणाची झालेली दुरावस्था या सर्व बाबी बघितल्या की त्यावर स्वतःलाच स्वतःच्या पातळीवर काहीतरी मार्ग काढण्याची गरज निर्माण झालेली दिसते.

       शिक्षणाचा विचार करता फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय निवडला गेला.  या पद्धतीचे अनेक तोटे सर्वांसमोर येऊ लागले, त्याच्या मर्यादा स्पष्ट झाल्या.  या शिक्षणातून आपण निकाल लावू शकतो, विद्यार्थी पुढच्या वर्गात जाऊ शकतात; पण ज्ञानाचे काय? हा प्रश्न पडतोच.  शिक्षण प्रक्रियेत मूल्यमापनाचे स्थान अनन्यसाधारण असते आणि हे मूल्यमापन योग्य होते आहे का? हा खरा प्रश्न आहे.  ऑनलाइन शिक्षणाच्या अगोदर, 50 टक्के गुण घेणारा विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेताना जर 90 टक्के गुण घेत असेल तर हे मूल्यमापन योग्य होते आहे का? हा प्रश्न सहजच पडतो.  आपल्या मुलाच्या शिक्षणाबाबत पालकांनी आता सजग बनण्याची गरज आहे.  कदाचित विद्यार्थी मित्रांना ऑनलाइन शिक्षणातला काही सोयीचा भाग आवडला असेल, गुण सुद्धा चांगले मिळण्यातला आनंद मिळत असेल,  मेहनत जास्त करावी लागत नाही यातलं सुख मिळत असेल, परीक्षा पद्धतही आवडली असेल; पण याचे दूरगामी परिणाम मात्र फारच घातक ठरू शकतात, याची जाणीव विद्यार्थ्यांना शिक्षकांनी, पालकांनी करून दिली पाहिजे.



       अचानकपणे कोरोनाच्या आलेल्या या संकटामुळे ऑनलाइन शिक्षण हाच पर्याय असल्याने, शिक्षक वर्गाला ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान शिकून घेणे क्रमप्राप्त ठरले आणि हे आव्हान शिक्षकांनी समर्थपणे पेलले देखील.  पण या पद्धतीतील मर्यादा लक्षात घेऊन ती पोकळी भरून काढणे आवश्यक वाटते.  या परिस्थितीत स्वयं हा मंत्र खूपच उपयुक्त ठरू शकतो.  स्वयंअध्ययन, स्वयंशिस्त, स्वयंमूल्यमापन या गोष्टी फार महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.  ऑनलाईन शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांनी स्वयंअध्ययनावर भर दिला पाहिजे.  ऑनलाइन शिक्षणातून कदाचित अभ्यासक्रम पूर्ण केला जाऊ शकतो; पण त्यातले सखोल ज्ञान मिळवण्यासाठी विद्यार्थ्याला स्वयंअध्ययन करणे फार आवश्यक ठरेल.  एखादी संकल्पना स्पष्ट होण्यासाठी इंटरनेटचा उपयोग विद्यार्थी सहजपणे करू शकेल आज इंटरनेटवर कितीतरी ओपनसोर्स उपलब्ध आहेत.  नॅशनल डिजिटल लायब्ररी सारख्या स्त्रोतांमध्ये कितीतरी माहितीचा खजिना उपलब्ध आहे.  याचा फायदा विद्यार्थ्यांनी करून घेणे आवश्यक आहे.

       कोविड बॅच असा शिक्का बसणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम याचं गांभीर्य लक्षात आणून द्यावे लागेल.  नोकरी मिळवताना काय अडचणी येऊ शकतात? हे त्यांना सांगावं लागेल. कदाचित एखाद्या नोकरीसाठी कोविड बॅचच्या विद्यार्थ्यांनी अर्ज करू नयेत असाही शेरा असू शकतो.  याबाबत आपण सतर्क असले पाहिजे.  या लॉकडाउन काळात मी काय केले?  कोणती कौशल्ये विकसित केली? कला, क्रीडा, ज्ञानसाधना काय केली?  हे मुलाखतीच्या वेळी विद्यार्थ्यांना सांगता यायला हवं.  विद्यार्थी आज विविध विद्यापीठांचे ऑनलाईन कोर्स करू शकतात.  सरकारच्या स्वयं पोर्टल वरून अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात.  गरज आहे ती परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पावले टाकण्याची,  गरज आहे स्वयंशिस्तीची,  गरज आहे स्वयं मूल्यमापनाची,  गरज आहे ती कठीण प्रसंगातून मार्ग काढण्याची,  सावरण्याची.  

       लॉकडाऊन किंवा इतर व्यवहार ठप्प झाल्याने आपण घराबाहेर जात नाही, पण आपल्या वाट्याला येणारे दिवसाचे 24 तास हे तेवढेच आहेत, त्यामुळे त्या वेळेचा सदुपयोग कसा करावा? हे आपल्याच हातात आहे.  शाळा - महाविद्यालये सुरू असताना विद्यार्थ्यांचे एक वेळापत्रक होते, त्यानुसार सर्व व्यवहार सुरू होते; पण शाळा - महाविद्यालये बंद झाल्यावर, वेळापत्रक पूर्णपणे बाजूस पडले. खरं म्हणजे अशा एका परिस्थितीनुरूप वेळापत्रकाची आत्ता खरी गरज आहे.  विद्यार्थ्याने आपल्या दिनक्रमाचे वेळापत्रक निश्चित केले पाहिजे.  संकटाला संधी मानून काहीतरी नवीन शिकण्याची गरज आहे, तरच पुढचा काळ विद्यार्थ्यांसाठी सुकर असू शकेल.

       थोडक्यात स्वयंप्रेरणा, स्वयंअध्ययन, स्वयंमूल्यमापन, स्वयंशिस्त या सर्वांचा अंगीकार करणे ही काळाची गरज आहे.  या सर्व परिस्थितीत स्वयं या मंत्राचे अस्त्र आपणाला नक्कीच तारू शकते.