
माणसाची उत्पत्ती जरी पशूपासून झाली असली तरी, बुद्धीच्या जोरावर माणसाने आपली प्रगती केली. सद्यस्थितीत मात्र विकासाच्या प्रक्रियेत आणि हव्यासापोटी माणूस आपले मनुष्यत्व हरवत चालला आहे हे वारंवार जाणवते. महात्मा गांधी म्हणतात “निसर्गात प्रत्येक माणसाची गरज भागवणारे सर्वकाही आहे” हे खरे आहे; पण माणसाने आपणास हवे तेवढे निसर्गाकडून घेतलेच आणि नको तेही घेतले. निसर्गाशी प्रतारणा करून, निसर्गाची वारेमाप लूट करून आपण आपली प्रगती कधीच करू शकत नाही, कदाचित आपणास ती प्रगती वाटत असली तरी भविष्यकाळासाठी ती अधोगतीच ठरेल; कारण निसर्गाचा असमतोल ही माणसाला एक न परवडणारी गोष्ट आहे. माणसाची ही घेण्याची प्रवृत्ती त्याच्या विनाशास कारणीभूत ठरणारी आहे. अधून मधून निसर्ग आपले रौद्र रूप धारण करून याची जाणीव करून देत आहे.
माणूस नेहमीच
अनाकलनीय असाच आहे तो कोणत्या क्षणाला कसा वागेल? हे सांगता येत नाही. तो सरड्याप्रमाणे रंग बदलतो, फरक इतकाच की सरडा आपल्या संरक्षणासाठी, तर माणूस आपल्या
स्वार्थासाठी रंग बदलतो. माणसांचे हे रूप पाहिल्यावर माधवी देसाई यांची
एक कविता आठवते. त्या आपल्या एका कवितेतून माणसाचे वागणे खूप चांगल्या शब्दांत व्यक्त
करतात.
जंगलात एक बरं
असतं
कारण सारं काही तेथे
खरं असतं.
माणसाच्या जंगलाचा कायदाच न्यारा
ससा
म्हणून जवळ घ्यावं तर
वाघ बनून नरडीचा घोट कधी घेईल सांगता येत नाही
वाघ म्हणून दूरून जावं तर
ससा बनून कधी पायाशी घोटाळेल हे सांगता येत
नाही.
या
ओळींमधून माधवी देसाई माणसाच्या बेभरवशी वागण्यावर नेमका प्रकाश टाकतात. आज माणसाचं वागणं बघितलं की याचं जागोजागी प्रत्यंतर येतं
आणि मग व. पु. काळे यांची “ज्याच्यावर आय.एस.आय.चा शिक्का मारता येत नाही असं माणूस नावाचं एक यंत्र आहे”
ही माणसाची व्याख्या पटायला लागते.
आज माणूस आपलं
मनुष्यत्व हरवत चाललेला दिसतो. “स्वतःसाठी कमविणे
म्हणजे पशुत्व, आपल्यासाठी कमविणे
म्हणजे मनुष्यत्व व परोपकारार्थ कमविणे म्हणजे देवत्व” असे शास्त्रवचन सांगते. सध्य काळात
बलात्कार, हुंडाबळी, खून, मारामाऱ्या, भ्रष्टाचार असे माणसाचे कारनामे बघता मन सुन्न होते आणि मग
माणसाचा प्रवास मनुष्यत्वा कडून पशुत्वाकडे चालला आहे की काय? असा प्रश्न पडतो. साधुसंत, ज्यांना आम्ही देवत्व बहाल केलं आहे अशा लोकांकडूनही
जेव्हा हीन प्रकार घडतात तेव्हा देवत्वाचा बुरखा बाजूला सरून माणसाच्या आतलं पशुत्वाचं खरं रूप उघडं होतं.
दुसऱ्या बद्दल वाईट चिंतणे, एकमेकांची उणीदुणी काढणे, दुसऱ्याला कमी लेकणे, मी पणा मिरवणे, स्वार्थासाठी लाळघोटेपणा करणे यातच माणूस व्यस्त आहे. आज गर्दीमध्ये दुसऱ्याच्या डोक्यावर पाय देऊन पुढे जाणारी माणसे दिसतात. भेसळ करून फायदा लाटताना सामान्यांच्या आरोग्याचा, धोक्याचा विचार न करणारी माणसे दिसतात. दुसऱ्याच्या जखमेवर मीठ चोळून आनंदाने उड्या मारणारी माणसे दिसतात. जीवघेण्या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी कशाची पर्वा न करता, नीतिमूल्ये गुंडाळून भ्रष्ट वागणारी माणसे दिसतात. ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्याच्यावरच कृतज्ञपणे वार करणारी माणसे आपणास दिसतात. स्वतःच्या चुकांचे समर्थन करत जगणारी माणसं, दुसऱ्याच्या दुःखात आपलं सुख शोधणारी माणसं आपणास दिसतात. माणसाची ही रूपे पाहिली की हरवलेली माणुसकी सहजपणे आपल्या लक्षात येते.

भावाकडून बहिणीवर
बलात्कार, बापाकडून मुलीवर
बलात्कार, शिक्षकाकडून
विद्यार्थिनीवर बलात्कार, हुंडाबळी, ऍसिड हल्ले, एकतर्फी
प्रेमातून जिवंत जाळणे हे सर्व पाहिले की खरोखरच शरमेने मान खाली जाते. दिल्ली बलात्कार प्रकरण, हैदराबाद बलात्कार प्रकरण यासारखी अनेक
प्रकरणे नित्यनेमाने चालू आहेत. ज्यांना आम्ही
साधुसंत मानतो त्यांनाही कोणत्यातरी वाईट कृत्या साठी जेल मध्ये जावे लागते आहे. विकासाच्या अत्युच्च
टोकावर असणाऱ्या माणसाकडून अशा प्रकारच्या घडणाऱ्या घटना ही माणसाची अधोगतीच
म्हणावी लागेल. अशा घटना पाहिल्यावर माणसाचा प्रवास मनुष्यत्वा कडून पशुत्वाकडे चाललेला आहे की काय? असा प्रश्न पडतो.
कुष्ठरोग्यांची सेवा करणाऱ्या, अपंगांची सेवा करणाऱ्या, गरिबांची सेवा करणाऱ्या अशा माणसांचे प्रमाण अत्यल्प आहे आणि अशा काही मोजक्या माणसांकडे बघितल्यावरच आपणाला जगण्याची उमेद येते. जर प्रत्येकाने भाऊ-बहीण, मुलगा-मुलगी, आई-बाप, मित्र आणी शेवटी माणुस हे नातं जोपासलं तर जग सुंदर व्हायला वेळ लागणार नाही. “माणसातल्या मनुष्यत्वाचा 100% विकास म्हणजे त्याचा देवत्वाकडचा प्रवास” असे म्हणता येईल. आज देवत्वा पेक्षा माणसांमध्ये मनुष्यत्व जोपासण्याची गरज निर्माण झाली आहे. आपणाला पुढच्या पिढी मध्ये मनुष्यत्वाचा विकास करायचा असेल तर सर्वप्रथम आपणालाच माणुसकी जोपासावी लागेल. आपल्यातलं मनुष्यत्व विकसित करावं लागेल त्याच वेळी आपण पुढच्या पिढीवर चांगले संस्कार घडवू शकतो.
